महाराष्ट्रात गौमातेला राज्यमातेचा दर्जा स्वागतार्ह गौमाता संवादयात्रा स्वागतप्रसंगी हंसराज अहीर यांचे प्रतिपादन

 




महाराष्ट्रात गौमातेला राज्यमातेचा दर्जा स्वागतार्ह गौमाता संवादयात्रा स्वागतप्रसंगी हंसराज अहीर यांचे प्रतिपादन

◾ केमिकलयुक्त दुग्धोत्पादकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न ग्राह्य मानुन गुन्हे नोंदविण्याची मागणी

◾  वनभुमीवर चारा बॅंकेच्या संकल्पनेवर विशेष भर  



चंद्रपूर/यवतमाळ ( Rajya Reporter News ) : गौसंवर्धन, गौसेवा, ग्रामविकास व भारतीय संस्कृतीचे संवर्धक मानल्या गेलेल्या गौमातेचा पोषण, संगोपन व संवर्धनाचा संदेश देणाऱ्या  राज्यमाता गौमाता संवाद यात्रेचे चंद्रपूर महानगरातील डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात दि. 03 जुलै रोजी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष मागासवर्ग आयोग हंसराज अहीर यांनी मान्यवर मंडळी तसेच शेकडो गौभक्त, नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत केले. या यात्रेनिमित्त आयोजित जनसंवाद सोहळ्याला गौपालक, शेतकरी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

          जनसंवाद सोहळा कार्यक्रमास महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष मा. शेखर मुंदडा, संतश्री मनीषभाई महाराज, दिनेश बजाज, खुशाल बोंडे, रघुवीर अहीर, दिलीप कपूर तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

          याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना हंसराज अहीर यांनी राज्य सरकारने गौमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याच्या निर्णयाचे स्वागत करीत गौधन व पशुधनाच्या संवर्धन व संरक्षणासाठी मुबलक चारा उपलब्धतेच्या गरजेवर विशेष भर दिला. हा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने शासनाने प्राधान्य देत वनजमिनीवर नैसर्गिकरीत्या उगवणारे गवत पशुधनासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यात चारा बँक उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या प्रश्नी लोकसभेच्या कार्यकाळात खासगी विधेयक मांडले होते व विविध स्तरांवर यासंदर्भात पत्रव्यवहार करून हा विषय सातत्याने रेटण्यात आल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

वनभुमीवर चारा बॅंक उभारण्याकरिता मुख्यमंत्री व वनमंत्र्यांकडे पाठपुरावा

          राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चारा बँक स्थापनेसंदर्भात पाठपुरावा केल्याचे सांगत, वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत याविषयी प्रत्यक्ष चर्चा व पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले. राज्यात चारा बँकेची संकल्पना प्रत्यक्षात साकार झाल्यास गौपालकांना परवडणाऱ्या दरात चाऱ्याची उपलब्धता होईल, पशुपालकांच्याही अडचणी दूर होतील, पर्यायाने पशुधन संवर्धनाला राज्यात मोठी चालना मिळेल, असा विश्वास अहीर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला.

          पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध होत नसल्याने तसेच दिवसेंदिवस चाऱ्याच्या वाढत्या खर्चामुळे गौपालक व पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ उद्भवली असल्याची चिंता व्यक्त करीत यावर चारा बँक उभारणी हाच योग्य पर्याय असून त्यामुळेच पशुपालकांपूढे उद्भवलेले प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला. चारा बॅंकेच्या सोयीमुळे दूग्धोत्पादनात मोठी वृध्दी होऊन वाढती दुधाची मागणी सुलभरित्या पूर्ण होण्यास मदत होईल. गौधनसंख्येमध्ये वाढ होऊन गोमातेच्या संरक्षणाचा हेतु साध्य होईल, असेही अहीर यांनी सांगितले. राज्यात केमिकल व भेसळयुक्त दुग्धोत्पादन करणारे लोकांच्या जिवीताशी खेळत आहेत. अशा उत्पादकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न ग्राह्य मानुन गुन्हा कायम करण्याची मागणी हंसराज अहीर यांनी याप्रसंगी केली.

          गौमातेला ‘राज्यमाता’दर्जा देण्याचा सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करीत, हा निर्णय गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीच्या जतनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले. या निर्णयाचे भविष्यात चांगले दूरगामी परिणाम दिसून येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

          महाराष्ट्र गौसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी उपस्थितांशी संवाद साधतांना गौसंवर्धनासाठीच्या शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, अनुदाने आणि आर्थिक सहाय्याच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. पशुपालकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

          कार्यक्रमात उपस्थित अन्य मान्यवरांनी गौसंवर्धन, पशुधन विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. राज्यमाता गौमाता संवाद यात्रेमुळे गौसेवा, गौसंवर्धन आणि पशुपालकांच्या समस्यांबाबत जनजागृती निर्माण होण्यास मदत होत असल्याची भावना पशुपालक व उपस्थित गौभक्तांनी व्यक्त केली.






Post a Comment

0 Comments